तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही
डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही...
पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी,
तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....
शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही,
अनेक वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही...
संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही
पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही....
एकटं एकटं वाटतं पण, तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......
(फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक....)
No comments:
Post a Comment