Saturday, April 12, 2008

मालकी!!

गौतम बुद्धांची एक कथा.
बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला.
प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या. जमलेले लोक अस्वस्थ झाले, संतापलेही. पण तथागत शान्त होते. त्यांच्या चेहरयावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्ह्ते. तो माणूस बराच वेळ अद्वातद्वा शिव्याशाप देत होता. बरयाच वेळाने तो थकून थांबला व डोळे तारवटून गौतमांकडे पहात राहिला.
तथागतांनी स्मितहास्य केले व शान्त स्वरात ते बोलले,
"मी तुला एक प्रश्न विचारू काय?"
"विचारा" तो गुरगुरला.
"जर तुला कोणी एखादी वस्तू भेट दिली आणि ती भेट स्वीकारण्यास तू नकार दिलास तर त्या भेटीवर मालकी कुणाची?"
"मालकी?"
"हां, ती भेटवस्तू कोणाकडे राहील?"
"इतकही कळत नाही? सोपं आहे, ती वस्तू त्या देणारयाकडे राहील" तो माणूस म्हणाला.
"अगदी बरोबर!" तथागत स्मित करीत म्हणाले, "मग जर मी तुझे हे शिव्याशाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे रहातील?"
तो माणूस सुन्न झाला आणि तथागतांच्या चरणी लागला.
तात्पर्य: जगात कोण आपल्याला काय बोलेल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण त्यांच्या स्तुतिशापांचा स्वीकार करणे न करणे हे पुर्णपणे आपल्याच हाती असते. आपण स्वताचा अपमान करून घ्यायचा म्हटला तर तो घोर अपमान होऊ शकतो अन्यथा ते असतात केवळ शब्दांचे बुडबुडे! ऑफिसात, समाजात वावरतांना हे जर लक्षात ठेवले तर खूपच मनस्ताप कमी होऊ शकतो.

No comments: